दुबई : भारताचा क्रिकेट दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे भारतीय नियामक क्रिकेट मंडळ आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू झालेल्या वादामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले. दोन्ही बोर्डात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याचा अधिकार आयसीसीला नसल्याचेसुद्घा त्यांनी म्हटले आहे. कॅरेबियन क्रिकेट संघाने भारतीय दौरा अर्धवट सोडल्यामुळे बीसीसीआयने वेस्ट इंडीजविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, विंडीजविरुद्धच्या सर्व मालिका रद्द केल्या आहे. यासंदर्भात आयसीसीने स्पष्ट केले, की दोघांनीही आपला वाद सामोपचाराने मिटवावा. आयसीसीने या दोन्ही बोर्डातील वादाबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि संपूर्ण प्रकरणावर त्यांचे लक्ष असणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे, की जोपर्यंत या प्रकरणात आयसीसीने हस्तक्षेप करावा असे दोन्हीही बोर्डापैैकी जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत या वादात चौकशी करण्याचा अधिकार नाही. (वृत्तसंस्था)
भारत-वेस्ट इंडीज वादात हस्तक्षेप नाही
By admin | Updated: October 24, 2014 03:24 IST