नवी दिल्ली : फिक्सिंगमधील दोषींना दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकासह राष्ट्रीय क्रीडा नैतिक आयोगाची शिफारस करणारी तीन अशासकीय विधेयके बीसीसीआय सचिव खा. अनुराग ठाकूर यांनी सादर केली आहेत.२०१३ च्या आयपीएल फिक्सिंगमुळे बीसीसीआय वादात अडकले. या प्रकरणी एस. श्रीसंत, अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अन्य दोघांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.या पर्श्वभूमीवर ठाकूर यांचे पाऊल महत्त्वाचे मानले जाते. कुठल्या कारणांमुळे लोकसभेत ही विधेयके सादर केली, असे विचारताच ठाकूर म्हणाले,‘ क्रिकेट चाहत्यांप्रति प्रामाणिक होणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी या विधेयकांची गरज आहे. फिक्सिंगला आळा घालणारा कुठलाही कायदा नाही. फिक्सिंगविरुद्ध लढण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. लोकसभेत हे विधेयक सादर करण्यामागे राष्ट्रीय क्रीडा नैतिक आयोगाची स्थापना करणे हा हेतू आहे. यानुसार खेळात नैतिक जबाबदारीसोबतच डोपिंग, फिक्सिंग, अफरातफर, महिलांवरील अत्याचार आदींना आळा बसण्यास मदत होईल.(वृत्तसंस्था) विधेयकातील तरतूदठाकूर यांनी मांडलेली विधेयके मंजूर झाल्यास फिक्सिंगमधील दोषी खेळाडूवर बंदी येण्यासह त्याला दहा वर्षांची शिक्षा होईल शिवाय लाचेच्या रकमेच्या पाच पट रकमेचा त्याला दंड ठोठावला जाणार आहे. वय लपविणे किंवा लिंगबदलाबाबतच्या अफरातफरीवर सहा महिन्यांची कोठडी तसेच एक लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल. खेळाडूंसह त्याला मदत करणारे कोच आणि क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील शिक्षेच्या कक्षेत आणले जाणार आहे.राष्ट्रीय क्रीडा नैतिक आयोगात न्यायाधीशांसह प्रसिद्ध खेळाडूंचाही समावेश असेल.
फिक्सिंगधील दोषींना दहा वर्षांच्या शिक्षेचा प्रस्ताव
By admin | Updated: May 2, 2016 02:11 IST