अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढत नेहमीच चुरशीची होती. उद्या (सोमवार) हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघ अबुधाबीत एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला होता. केवळ चौकार जास्त असल्याने राजस्थानला विजयी घोषित करण्यात आले होते. असा थरार अनुभवाचा आस्वाद पुन्हा लुटता यावा यासाठी अहमदाबाद येथील क्रिकेटचाहते आतुर झाले आहेत.राजस्थानच्या इच्छाशक्तीसमोर कोलकाताचा संघ दुबळा वाटतो. राजस्थानने शनिवारी दिल्लीवर विजय मिळवून आपण जेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे ठणकावून सांगितले. या विजयात करुण नायर याने झंझावाती खेळ केला; तर दुसरीकडे, कोलकाताला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला आहे. फलंदाजी ही राजस्थानसाठी जमेची बाजू आहे. त्यांनी सलग तीन सामन्यांत विजय साजरा केला आहे आणि कोलकाताची कामगिरी पाहता ते विजयी चौकार मारतील, अशी आशा आहे. त्यांच्याकडे अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन, संजू सॅमसन आणि करुण नायर ही फौज आहे. गोलंदाजीत प्रवीण तांबे भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याला वॉटसन, केन रिचर्डसन, जेम्स फॉल्कनर, रजत भाटिया आणि धवल कुलकर्णी यांची साथ आहे. कोलकाताच्या बाबतीत विचार केल्यास गौतम गंभीर, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण यांना अद्याप सूर गवसलेला नाही. गंभीरने आत्तापर्यंत केवळ ५२ धावा, तर पठाणने ५९ धावा केल्या आहेत. संघात १४५ धावा करणारा मनीष पांडे अव्वल खेळाडू आहे. गोलंदाजीत सुनी नरीन वगळता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याला पीयूष चावला, मॉर्ने मॉर्केल, शकिब अल हसन आणि विनयकुमार यांच्याकडून योग्य साथीची आवश्यकता आहे.
राजस्थान घोडदौड कायम राखणार ?
By admin | Updated: May 5, 2014 15:03 IST