नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात वैयक्तिक विक्रम नोंदवण्याची संधी राहील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत डेरेदाखल झाला आहे. डावखुरा सलामीवीर शिखर धवनला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. शिखरने १४ कसोटी सामन्यांत ४१.५० च्या सरासरीने ९९६ धावा फटकावल्या असून, एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ चार धावांची गरज आहे. रोहित शर्माला एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी या मालिकेत कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. रोहितने आतापर्यंत ११ कसोटी सामन्यांत ३९.२९ च्या सरासरीने ६६८ धावा फटकावल्या आहेत. त्याला हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ३३२ धावांची गरज आहे. विराट कोहलीने आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील फॉर्म कायम राखला तर तो या मालिकेत तीन हजार धावांचा टप्पा गाठू शकतो. विराटने आॅस्ट्रेलियात शानदार फलंदाजी करताना ७०० धावा फटकावल्या. विराटने ३४ कसोटी सामन्यांत ४५.७३ च्या सरासरीने २५६१ धावा फटकावल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यात एकमेव कसोटी सामन्याद्वारे भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या आॅफस्पिनर हरभजनसिंगला या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली तर तो वीरेंद्र सेहवागला (१०३ कसोटी) पिछाडीवर सोडताना सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये नवव्या स्थानावर दाखल होईल. हरभजनने आतापर्यंत १०२ कसोटी सामन्यांत २२०९ धावा फटकावल्या असून, ४१६ बळी घेतले आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या जागतिक गोलंदाजांच्या यादीत तो नवव्या स्थानी आहे. हरभजनला शॉन पोलॉकचा (४२१ बळी) विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हरभजनपेक्षा कपिलदेव (४३४ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) यांनी अधिक फलंदाजांना बाद केले आहे.(वृत्तसंस्था)
भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम नोंदविण्याची संधी
By admin | Updated: August 4, 2015 00:43 IST