नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी केली आहे. बीजिंग आॅलिम्पिक, नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा, ग्वांगझू आशियाड किंवा २०१२ च्या लंडन आॅलिम्पिककडे नजर टाकल्यास यशाचा आलेख कायम उंचावलेला दिसेल. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीचे मूल्यमापन मात्र माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांच्या पुरस्कार निवड समितीने केले असे वाटत नाही. यंदा सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’साठी एकाही खेळाडूची दखल न घेणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. यंदा खेलरत्नसाठी सोमदेव देवबर्मन, महिला थाळीफेकपटू कृष्णा पुनिया, थाळीफेकपटू विकास थापा, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, गोल्फर जीव मिल्खासिंग, पॅरा अॅथलिट देवेंद्र झांझरिया शर्यतीत होते; पण यापैकी एकालाही खेलरत्नच्या लायकीचे मानण्यात आले नाही. गेल्या २१ वर्षांत खेलरत्नसाठी कुणाच्याही नावाचा विचार न होणे तिसऱ्यांदा घडले. याआधी १९९३-९४ साली मंत्रालयाने कुणाचीही निवड केली नव्हती. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन द्यावे, असा वारंवार पुळका क्रीडा मंत्रालय, साई व आयओएद्वारा आणला जातो; पण खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेण्याची वेळ आली, की नांगी टाकली जाते. हा एकप्रकारे खेळाडूंच्या कामगिरीचा अपमान आहे. (वृत्तसंस्था)
‘खेलरत्न’साठी निवड न होणे अपमान
By admin | Updated: August 14, 2014 04:49 IST