नवी दिल्ली : अजरबजानच्या गबाला येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या ५० मीटर पुरुष पिस्टल स्पर्धेत भारताच्या प्रकाश नंजप्पा याने आठवे स्थान पटकावत २०१६ सालच्या रियो आॅलिम्पिक कोट्याचे लक्ष्य साध्य केले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अर्धांगवायूच्या आजारातून सावरत त्याने ही कामगिरी केली आहे. बेंगळुरूचा ३९ वर्षीय नंजप्पा हा देशाला रियो आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा सहावा नेमबाज ठरला आहे. जागतिक क्रमवारीत नंजप्पा ५२ व्या स्थानी आहे. त्याने पात्रताफेरीत ५६७ अंक मिळवित दुसऱ्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम फेरीत फारशी चांगली कामगिरी झाली नसल्याने नंजप्पा स्पर्धेबाहेर झाला. मात्र, देशाला आॅलिम्पिक तिकीट मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. यापूर्वी रियो कोटा मिळवून दिलेला जीतू रायदेखील या स्पर्धेत सहभागी झाला होता. यात तो चौथ्या स्थानावर राहिला. आॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग, अपूर्वी चंदेला, गुरप्रीतसिंह हे नेमबाज रियोचा कोटा मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. दक्षिण कोरियातील चांगवेन येथे २०१३ साली झालेल्या ग्रेनाडा विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. ही स्पर्धा सुरू असतानाच त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. यातून सावरत आॅक्टोबर २०१३ साली तेहरान येथे झालेल्या आशियाई एअरगन स्पर्धेत ५० मीटर पिस्टल प्रकारात रौप्यपदकाचा वेध घेतला होता. (वृत्तसंस्था)
नेमबाजीत नंजप्पाला रियोचे तिकीट
By admin | Updated: August 12, 2015 04:16 IST