पुणे : धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात महाराष्ट्राने मोक्याच्या वेळी टिच्चून मारा करून हिमाचल प्रदेशाचा २५ धावांनी पराभव करून विजय हजारे स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ७ बाद ३७६ धावांचा हिमालय उभारल्यानंतर हिमाचल प्रदेशानेही तोडीस तोड फटकेबाजी करीत सामना रोमांचक केला. परंतु, त्यांचे प्रयत्न २५ धावांनी कमी पडले. ऋतुराज गायकवाडच्या (१३२) दमदार शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद ३७६ धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेशाने त्याच तोडीची फटकेबाजी केली. सलामीवीर प्रशांत चोप्राने ८५ चेंडूंत १०० धावा काढून महाराष्ट्राचा विजय जवळजवळ हिसकावलाच होता. परंतु, जगदीश झोपेने चोप्राची बॅट शांत करून महाराष्ट्राची धावपळ थांबवली. रॉबिन बिस्त (४६) आणि पारस डोग्रा (२५) यांनी संघाला काही प्रमाणात सावरले.परंतु, ठराविक अंतराने बळी मिळवताना महाराष्ट्राने अखेरपर्यंत वर्चस्व मिळविले. दरम्यान, अंकित कौशिकने मधल्या काही षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करीत ३४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५९ धावा चोपल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने बळी जात राहिल्याने त्याची झुंज अपयशी ठरली. जगदीश झोपे (४/६०) आणि श्रीकांत मुंढे (३/७५) यांनी चांगला मारा केला.तत्पूर्वी, ऋतुराजने ११० चेंडंूत १२ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करीत ११० चेंडंूत १३२ धावांचा तडाखा दिला. त्याला उपयुक्त साथ दिलेल्या विजय झोलने ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ६२ धावा काढल्या. या दोघांनी १६७ धावांची शानदार सलामी संघाला दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर नौशाद शेख (३९ चेंडूत ७२) आणि श्रीकांत मुंढे (२० चेंडूंत ४२) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राने धावांचा डोंगर उभारला. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : ५० चेंडंूत ७ बाद ३७६ धावा (ऋतुराज गायकवाड १३२, विजय झोल ६२, नौशाद शेख ७२; पंकज जैसवाल २/८२) वि.वि. हिमाचल प्रदेश : ४८.५ षटकांत सर्व बाद ३५१ धावा (प्रशांत चोप्रा १००, अंकित कौशिक नाबाद ५९; जगदीश झोपे ४/६०, श्रीकांत मुंढे ३/७५).
महाराष्ट्र विजयी
By admin | Updated: February 26, 2017 04:08 IST