चेन्नई : डावखुरा फिरकीपटू एस्टन एगरच्या अचूक माऱ्यानंतर ख्रिस लिन व एडम जंपा यांनी झळकाविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघाला ३ विकेट्सने नमवून तिरंगी वन-डे मालिकेची अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे अनेक खेळाडू आजारी असल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळण्यासाठी उतलेल्या भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २५८ धावांची मजल मारली. भारतातर्फे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा मयंक अग्रवाल (६६) आणि मनीष पांडे (६०) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला कर्ण शर्माने (४५ धावांत ३ बळी) धक्के दिले, पण ख्रिस लेन (६३), जंपा (५४), कॅलम फर्ग्युसन (नाबाद ४५) आणि ट्रेव्हिस हेड (४५) यांनी उपयुक्त योगदान देत आॅसी संघाला विजयासाठी आवश्यक धावा ४८.३ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करून दिल्या. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला आज आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागणार होते, पण त्यांचे अनेक खेळाडू आजारी झाल्यामुळे कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता उभय संघांदरम्यान मंगळवारी लढत होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सातव्या षटकात कर्णधार उन्मुक्त चंद (५) माघारी परतला. त्याला जेम्स पॅटिन्सनने बाद केले. पुढच्याच षटकात आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड व पांडे यांच्यादरम्यान धडक झाली. त्यामुळे पांडेला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. अग्रवालने दुसऱ्या टोकाकडून गुरविंदर संधूच्या एका षटकात दोन चौकार व एक षटकार वसूल करीत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण एगरने पहिल्या षटकात अग्रवाल व केदार जाधव यांना एकापाठोपाठ माघारी परतवत भारताची ३ बाद ९८ अशी अवस्था केली. अग्रवालने ६१ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व १ षटकार ठोकला. एगरने त्यानंतर करुण नायर (३२), संजू सॅम्सन (२३) आणि अक्षर पटेल (२०) यांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. पांडेने पुन्हा फलंदाजीला येताना काही चांगले फटके खेळले. त्याला ऋषी धवनची (नाबाद २६) योग्य साथ लाभली. त्यामुळे भारताला २५० धावांचा पल्ला पार करता आला.फॉर्मात असलेल्या आॅस्ट्रेलियन फलंदाजांसाठी लक्ष्य मोठे नव्हते. कर्णधार उस्मान ख्वाजा (१८) व हेड यांनी सलामीला ५८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताने २४ धावांच्या अंतरात चार बळी घेत आॅस्ट्रेलियाची ६ बाद १७८ अशी अवस्था केली होती, पण फर्ग्युसन व जंपा यांनी ८० धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एगर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.संक्षिप्त धावफलकभारत ‘अ’ : अगरवाल त्रि. गो. एगर ६१, पांडे झे, हेड गो. संधू ५०, नायर पायचीत गो. एगर ३२; एस्टन एगर ५/३९, गुरींदर संधू २/६६, जेम्स पॅटीन्सन १/२३. ५० षटकांत ९ बाद २५८ धावा. आॅस्टे्रलिया ‘अ’ : लेन त्रि. गो. पटेल ६३, झंपा त्रि. गो. संदीप शर्मा ५४, फर्ग्युसन नाबाद ४५, टे्रविस हेड त्रि. गो. शर्मा ४५; कर्ण शर्मा ३/४५, नायर १/३४, पटेल १/४५. ४८.३ षटकांत ७ बाद २६२ धावा
कांगारू ‘अ’ अंतिम फेरीत
By admin | Updated: August 11, 2015 00:44 IST