मीरपूर : स्टुअर्ट बिन्नी आणि मोहित शर्मा यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डेमध्ये यजमान बांगलादेशचा ४७ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली. पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत पंचांनी प्रत्येकी ४१ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजक कामगिरीमुळे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला, पण मोहित व बिन्नी यांनी अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान बांगलादेशचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला. प्रतिस्पर्धी संघाचा भारताविरुद्ध हा धावसंख्येचा निचांक ठरला. कारकीर्दीतील तिसरा सामना खेळणारा कर्नाटकचा गोलंदाज बिन्नीने ४.४ षटकांत ४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमधील ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याला योग्य साथ देताना ८ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगलादेशतर्फे मिथुन अली (२६) आणि मुशफिकर रहिम (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. त्याआधी, पदार्पणाची लढत खेळणारा युवा वेगवान गोलंदाज तास्किन अहमदच्या (५-२८) अचूक माऱ्याच्या जोरावर बांगला देशने दुसऱ्या वन-डे सामन्यात पाहुण्या भारताचा डाव १०५ धावांत गुंडाळला. अहमदच्या अचूक माऱ्यापुढे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशविरुद्ध भारताचा हा धावसंख्येचा निचांक ठरला. मशर्रफ मुर्तझाने अहमदला योग्य साथ देताना ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. १९ वर्षीय तास्किन पदार्पणाच्या सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी करणारा बांगला देशचा पहिला तर जगातील आठवा गोलंदाज ठरला. कर्णधार सुरेश रैनाने २७ धावा फटकाविल्या तर त्यानंतर ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या उमेश यादवने १३ चेंडूंमध्ये १७ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा व सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे (०) माघारी परतला. सहाव्या षटकांत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी भारताची १ बाद १४ अशी स्थिती होती. भारताच्या डावात रैना व यादव वगळता रॉबिन उथप्पा (१४) व चेतेश्वर पुजारा (११) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरले. (वृत्तसंस्था)
भारताचा मालिका विजय
By admin | Updated: June 18, 2014 05:45 IST