ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी बीसीसीआयने पाकिस्तानला निमंत्रण दिले असून डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये पाच एकदिवसीय व तीन टी - २० सामन्यांची मालिका रंगण्याची चिन्हे आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने केंद्र सरकारकडून परवानगी मागितली असून बीसीसीआयचे सचिव व भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी मालिकेला परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरु केल्याचे वृत्त आहे.
डिसेंबरमध्ये भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिका होणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरु होती. मात्र भारत - पाक संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता व शिवसेनेचा तीव्र विरोध यामुळे या मालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र बीसीसीआयने भारत - पाक मालिकेसाठी पुढाकार घेतला आहे. बीसीसीआय भारतातच ही मालिका भरवण्यास तयार असून राजकीय पक्षांकडून विरोध होणार नाही अशा ठिकाणी भारत - पाक मालिकेतील सामने खेळवण्याची बीसीसीआयची तयारी आहे. भारत - पाक मालिकेसाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास डिसेंबरमध्ये क्रिकेटप्रेमींना भारत - पाकिस्तान मालिकेचा थरार अनुभवता येईल. पाकिस्तान संघ २०१२ - १३ मध्ये भारत दौ-यावर आला होता.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीसीसीआयकडून अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे स्पष्ट केले आहे. भारत - पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध असावेत अशीच आमची इच्छा आहे पण पाकिस्ताननेही त्यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी अशी पुस्ती त्यांनी जोडली.