विनय नायडू, मुंबईफुटबॉल विश्वचषकाच्या मेगाइव्हेंटला सुरवात होत असताना यासंदर्भाच्या काही आठवणी भारतीयांच्या डोळ्यासमोरुन तरळून जातात. या सोहळ्याचा भाग व्हावा अशी प्रत्येक भारतीयांची गेली अनेक वर्षे अतृप्त असलेली आणि नजीकच्या भविष्यातही अतृप्त राहण्याची शक्यता असली तरीही या खेळाचा आस्वाद मात्र भारतात पुरेपूर लुटला जातो. २0१४ च्या विश्वचषकाला ब्राझीलमध्ये प्रारंभ होत आहे, आणि येत्या महिन्याभरात हा फुटबॉल फिव्हर पुऱ्या भारताला ग्रासून टाकणार आहे. १९८२ ला भारतात दुरदर्शनचे युग सुरु झाले. १९८६ साली दिएगो माराडोनाने आपल्या देशाला वर्ल्डकप मिळवून दिला आणि या त्याच्या देदिप्यमान कामगिरीची भूरळ भारतीयांना पडली. त्यानंतरच्या सात विश्वचषकात या लाईव्ह इव्हेंटने भारतीयांच्या मनाचा ठाव घेणे उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. १९८६ पासून हा खेळ भारतीयांच्या अधिक जिव्हाळ्याचा बनला आहे. विश्वचषकाचा घटक बनण्याचा योग १९५0 मध्ये भारताच्या नशिबी आला होता. पण काही घटनांमुळे हा सुवर्णयोग भारताला साधता आला नाही. त्यावर्षी पात्रता फेरीत भारताच्या गटातील सर्व संघांनी आपला सहभाग काढून घेतल्याने भारत आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरला. पण भारतात फुटबॉलचे संचालन करणाऱ्या एआयएफएफ संघटनेने या स्पर्धेत भारतीय संघ पाठविला नाही. त्यांना या स्पर्धेचे महत्त्वच कळले नव्हते. संघाच्या प्रवास खर्चासाठी निधी नसल्याचे कारण त्यावेळी एआयएफएफने दिले होते. वास्तविक फिफाने प्रवास खर्चातील काही रक्कम आपण देतो असे सांगितले असतानाही सराव झालेला नाही, संघ निवडीचा घोळ आणि वर्ल्डकपपेक्षा आॅलिम्पिक महत्त्वाचे आहे अशा थातूर-मातूर कारणास्तव एआयएफएफने संघ पाठविण्यास नकारच दिला. १९५४ला भारताला पुन्हा संधी आली होती, पण यावेळी फिफाने भारताला सहभागी होण्यास नकार दिला. आणि त्यानंतर भारतातील फुटबॉलची अधोगती सुरु आहे ती आहेच. असे असले तरी प्रत्येक वर्ल्डकपच्या वेळी भारतातील चाहते आपआपले संघ निवडूण त्यांच्यासाठी जल्लोष करीत असतात. याशिवाय ईपीएल, ला लीगा, चॅम्पियन्स लीग या सारख्या स्पर्धांनाही भारतात मोठा प्रतिसाद लाभतो. रात्रभर जागून क्लब आणि पबमध्ये टिव्हीच्या मोठ्या पडद्यावर फुटबॉल पाहणे आजकाल नित्याचे झाले आहे. आणि आता थ्रीजी क्रांतिमुळे लॅपटॉप, मोबाईल, टॅब, ट्विटर, फेसबुक याद्वारे तर हा खेळ प्रत्येकाचे जीवन व्यापून टाकणार आहे. भारत कधी काळी या स्पर्धेचा घटक होईल या आशेने पाहणारे आपण क्रोएशियाने फुटबॉल जगतात घेतलेली भरारी पाहून थक्क होतो. १९९३ साली युगोस्लोव्हीया या देशाची फाळणी होवून क्रोएशिया वेगळा झाला, आणि १९९८ च्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी पात्रताही मिळविली. ४.५ मिलियन इतकी लोकसंख्या असलेल्या या देशाचं वय अवघं २३, आणि आता तो ब्राझिलशी टक्कर घेण्यास सज्ज झाला आहे. १९९८ साली त्यांना तिसऱ्या स्थानावर घेवून जाणारा स्ट्रायकर डेव्होर सुकेर हा त्यांचा आता मार्गदर्शक आहे. फुटबॉलचा मॅजिक आणि सांबा याचा आनंद लुटण्याची वेळ आता आली आहे.
भारताने गमावले.. क्रोएशियाने साधले
By admin | Updated: June 12, 2014 04:48 IST