ऑनलाइन लोकमत
मेलबोर्न, दि. १९ - रोहित शर्माच्या (१३७) दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचे सर्व फलंदाज १९३ धावांवर बाद झाले. उमेश यादवने ४ तर शमी व जडेजाने प्रत्येकी २ आणि मोहित शर्माने १ बळी टिपत बांग्लादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत भारताने हा सलग सातवा सामना जिंकला असून कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा शंभरावा विजय आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाशी भारताची सेमी फायनलमध्ये गाठ पडेल.
तत्पूर्वी रोहित शर्मा व सुरेश रैनाच्या खेळीच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.