सिडनी : तिरंगी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सोमवारच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे २ गुणांवर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात पावसाच्या खेळीने ही लढत १६ षटकांनंतर थांबविण्यात आली आणि दोन्ही संघांनी २-२ गुण बहाल करण्यात आले.नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. काही षटके खेळून काढल्यानंतर पावसाने एंट्री केली. मात्र, थोड्याच वेळात सामना पुन्हा सुरू झाला. ही लढत ४४ षटकांची करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा फलंदाजीला आलेल्या भारताला सातव्याच षटकात झटका बसला. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ८ धावांवर मिचल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु १३व्या षटकात मिचल मार्श याने रायुडूला बाद केले. १६व्या षटकात पुन्हा पावसाने एंट्री घेतली आणि तो थांबलाच नाही. त्यामुळे ही लढत रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.(वृत्तसंस्था)
भारत-आॅस्ट्रेलिया सामना वॉश आऊट
By admin | Updated: January 28, 2015 02:09 IST