नवी दिल्ली : मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे यापूर्वी बदनाम झालेल्या एखाद्या संघाची जर सुस्थितीनंतर घसरगुंडी उडाली तर त्या संघाकडे साशंकतेने बघण्यात येते. मधल्या १० षटकात पाच गडी गमावले व त्यातही तीन फलंदाज धावचीत असतील तर मनात शंकेची पाल चुकचुकते. पाकिस्तान संघाबाबत सध्या असेच घडले. पाकिस्तान संघ युएईमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. पाकिस्तानने अलीकडेच कसोटी मालिका जिंकली असून तिसऱ्या वन-डेत पाकचे फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले, त्यामुळे चर्चा सुरू झालीे आहे. १७ नोव्हेंबरला शारजामध्ये झालेल्या या लढतीत पाकिस्तान ४९.५ षटकांत २०८ धावांत गारद झाला. इंग्लंडने ४१ षटकांत विजय साकारत २-१ अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारेल, असे चित्र होते, पण १० षटकांत त्यांचे पाच फलंदाज बाद झाले. इंग्लंडने चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. २९.३ षटकांत पाकिस्तानची २ बाद १३२ अशी दमदार स्थिती होती. ३९.३ षटकापर्यंत पाकिस्तानचे ७ फलंदाज बाद झाले. त्यात तीन फलंदाज धावबाद झाले. पाकच्या कामगिरीवर माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. याला सर्वस्वी प्रशिक्षक वकार युनूस जबाबदार असल्याची टीका माजी खेळाडूंनी केली. वकार संघात पक्षपात करीत असल्याचा आरोप जावेद मियांदाद यांनी केला.
इंग्लंड-पाक तिसरा वन डे सामना फिक्स ?
By admin | Updated: November 21, 2015 01:23 IST