ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २२ - विराट कोहलीचे शतक आणि भुवनेश्वर कुमार - हरभजन सिंगचा अचूक मा-यामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३५ धावांनी विजय मिळवला. भारताचे ३०० धावांचे आवाहन गाठताना आफ्रिकेला ५० षटकांत ९ गडी गमावत २६४ धावाच करता आल्या. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने आफ्रिकेसोबत २-२ अशी बरोबरी साधली आहे.
चेन्नईतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित - धवन ही सलामीची जोडी अवघ्या ३५ धावांमध्ये तंबूत परतल्यावर विराट कोहली व अजिंक्य रहाणे या जोडीने तिस-या विकेटसाठी १०४ धावांची भागादी रचली. रहाणे ४५ धावांवर बाद झाला. यानंतर विराटने रैनाच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. कोहलीने १३८ तर रैनाने ५३ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी (१५ धावा), हरभजन (०) आणि अक्षर पटेल ( नाबाद ४ धावा) यांना फटकेबाजी करता न आल्याने भारताला ५० षटकांत २९९ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे डेल स्टेन आणि कॅगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.
फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनाही सामन्यात चमकदार कामगिरी केली. सलामीवीर क्विंटन डीकॉकने ४३ धावांची खेळी केली. मात्र हरभजनच्या फिरकीवर तो अजिंक्य रहाणेकडे झेल देऊन माघारी परतला. ए बी डिव्हिलियर्सच्या ११२ धावांची खेळी वगळता आफ्रिकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ तर हरभजन सिंगने दोन विकेट घेतल्या. मोहित शर्मा, अक्षर पटेल व अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.