नवी दिल्ली : विंडीज संघाने गेल्या वर्षी भारत दौरा अर्ध्यावर सोडला होता. या प्रकरणात बीसीसीआयने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाप्रति कठोर भूमिका घेतली असून, त्यासाठी बीसीसीआयने विंडीज बोर्डाकडे ४१.९७ मिलियन डॉलर नुकसानभरपाईची मागणी केली होती. यासाठी बोर्डाने पुन्हा अल्टिमेटम पाठविला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरन व आंतर शासकीय कॅरेबियन समूहाचे (कॅरीकोम) सचिव इरविन लारोक यांना पाठविलेल्या पत्रात बीसीसीआयने नुकसानभरपाईची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे. कॅरेबियन बोर्डाने या पत्राचे उत्तर एका आठवड्यात दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी बीसीसीआयने विंडीज बोर्डाला दिली असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी २० जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘हे प्रकरण ज्या वेळी कॅरिकोममध्ये दाखल करण्यात आले, त्या वेळी बोर्डाकडून ४० दिवसांची मुदत मागितली होती. चर्चेनंतर या प्रकरणावर तोडगा निघेल, असा विचार करून बोर्डाने ही मुदत दिली होती; पण तसे घडले नाही. या प्रकरणात समाधानकारक तोडगा निघाला नाही. ४० दिवसांची मुदत आता संपलेली आहे.’ विंडीज संघाने बोर्डासोबत मानधनाच्या मुद्द्यावर झालेल्या वादामुळे भारत दौरा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बीसीसीआयला तातडीने श्रीलंकेविरुद्ध मालिकेचे आयोजन करावे लागले होते. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयने दिलाविंडीज बोर्डाला पुन्हा अल्टिमेटम
By admin | Updated: January 25, 2015 01:57 IST