बेंगळुरू : पहिल्या दिवशी चार बळी घेतले असले तरी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळत असल्याचे वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव शनिवारी पहिल्या दिवशी २१४ धावांत संपुष्टात आला. आश्विनने त्याचा सहकारी रवींद्र जडेजाच्या कामगिरीचीही प्रशंसा केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना आश्विन म्हणाला, ‘फिरकीपटूंचा चेंडू अधिक वळत असल्याचे मला वाटत नाही. मोहालीच्या तुलनेत आम्हाला येथे फलंदाजांना बुचकाळण्यात टाकण्यात अपयश आले. उपाहारानंतर जडेजाने चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी काही चुकीचे फटके खेळले. अखेरचे दोन-तीन फलंदाज ५०-६० धावांची भर घालू शकतात, त्यामुळे आम्ही सावध होतो.’आश्विन व जडेजा यांनी आतापर्यंत तीन डावांमध्ये प्रत्येकी १२ बळी घेतले, पण जडेजासोबत कुठलीही स्पर्धा नाही, असे आश्विनने म्हटले आहे. आश्विन म्हणाला, ‘मी याबाबत विचार करीत नाही. मी माझ्या कार्यावर लक्ष देतो. ज्यावेळी जडेजा गोलंदाजी करतो त्यावेळी मी माझा अनुभव त्याच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. जडेजाला त्याच्या मजबूत व कमकुवत बाजूची कल्पना आहे. शनिवारी उपाहारानंतर त्याने अचूक गोलंदाजी केली.’आश्विनच्या मते नव्या फलंदाजाला सुरुवातीला बाद करण्याची त्याच्याकडे ६० टक्के संधी असते. सुरुवातील २० मिनिटांमध्ये नव्या फलंदाजाला बाद करण्याची चांगली संधी असते. आज ड्युमिनी फलंदाजीला आला त्यावेळी त्याला बाद करण्याची योजना होती. तो कसे फटके खेळतो आणि त्याला बाद करण्यासाठी कशी गोलंदाजी करायची, याची कल्पना होती. आज आम्ही दोन्ही टोकांकडून दडपण निर्माण केले.’आश्विनने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या अजिंक्य रहाणेचीही प्रशंसा केली. अजिंक्यने आज ड्युमिनचा कठीण झेल टिपला. डिव्हिलियर्सबाबत बोलताना रहाणे म्हणाला, ‘आज डिव्हिलियर्स चुका करीत असल्याचे दिसून आले. त्याला या मैदानाची चांगली माहिती आहे. त्याने आज चांगले फटकेही खेळले, पण तो सामना आमच्यापासून हिसकावून घेत आहे, असे कधीच वाटले नाही.’ (वृत्तसंस्था)
चेंडू अधिक वळत असल्याचे वाटत नाही : आश्विन
By admin | Updated: November 14, 2015 23:04 IST