ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेला अन्य हंगामांच्या तुलनेत पहिल्या आठवडयात थंड प्रतिसाद मिळाला आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणा-यांना टीव्ही रेटींग्सची चिंता सतावत आहे तर, आयपीएलच्या पहिल्या आवठडयात महत्वाच्या स्टेडियम्समधील स्टँण्डस रिकामी असल्याचे दृश्य दिसले.
नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्डकपमुळे चाहत्यांचा आयपीएल बद्दलचा उत्साह कमी झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पहिल्या आठवडयात आयपीएलमध्ये पदार्पण करणा-या गुजरात लायन्सच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण राजकोटच्या मैदानाची प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता कमी आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे घरचे मैदान मोहाली, कोलकाता नाईट रायडर्सचे ईडन गार्डन्स, मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियम इथे नेहमीपेक्षा प्रेक्षकसंख्या कमी दिसली. टी-२० वर्ल्डकपमध्ये याच मैदानांवरील सामन्यांच्या तिकीटांसाठी प्रेक्षकांच्या उडया पडल्या होत्या. तिकीट न मिळाल्याने चाहते निराश होऊन परतताना दिसले होते.
वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती कमी दिसली. अन्य स्टेडियम्सपेक्षा नेहमी मुंबईमधील सामन्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. क्रिकेटच्या ओव्हरडोसमुळे क्रिकेट चाहत्यांची संख्या रोडावल्याचा विश्लेषकांचे म्हणणे आहे.
वर्ल्डकपपूर्वी वानखेडेवर भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सराव सामन्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. एमसीएच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षक आल्याने शेवटच्या मिनिटाला तिकीटांची छपाई करावी लागली होती. भारत-दक्षिण आफ्रिका सराव सामन्याच्यावेळी महागडे तिकीट ५०० रुपयांचे होते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये प्रेक्षकांचा तो उत्साह हरवलेला दिसत आहे.