नवी मुंबई : नेरूळमधील महापालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची मुदत संपली आहे. काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. येथील सेक्टर १६ मधील महापालिकेची शाळेची इमारत धोकादायक झाल्यामुळे पालिकेने ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे आॅगस्ट २०१५ मध्ये बांधकामाची मुदत संपली आहे, परंतु अजून काम पूर्ण झालेले नाही. इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना कुकशेत व इतर ठिकाणी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करण्यासाठी बांधकाम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ तालुकाप्रमुख गणेश भगत व नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पालिकेकडे केली असून, सर्वसाधारण सभेमध्येही प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नाला आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लेखी उत्तर दिले आहे. शाळेचा पाया खोदताना खडक लागल्यामुळे नगररचना विभागाच्या मंजुरी प्रक्रियेस विलंब लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नसून डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु कामाची गती पाहता ते डिसेंबरपर्यंतही पूर्ण होण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
पालिका शाळेचे काम रखडले
By admin | Updated: November 4, 2015 01:04 IST