लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी-कोपरखैरणे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने टप्प्याटप्प्यावर डबकी तयार झाली आहेत. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने वाहने आपटून अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे.गेली आठ दिवस संततधारेने अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाशी-कोपरखैरणे दरम्यानचा रस्ता तर ठिकठिकाणी उखडला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने बहुतांशी वाहने वाशी-कोपरखैरणे मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. या मार्गावरील ब्लू डायमंड चौकात कोपरखैरणेकडून येणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळून अपघात होत आहेत. ब्लू डायमंड चौकातून डावीकडे वळून कोपरी सिग्नलकडे जाणारा आणि तिकडून चौकाकडे येणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर वाशी सिग्नलजवळील उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
वाशी-कोपरखैरणे रस्त्याची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:43 IST