उल्हासनगर : राष्ट्रीय स्वच्छता अभियाना दरम्यान चक्क पालिका शौचालये सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. त्यावर अतिक्रमणाचे काम नगरसेवक करीत असून पालिकेने कारवाई ऐवजी धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. नकाशावरील शेकडो शौचालये गायब झाली असून याची पालिका दप्तरी नोंद नाही. शहरातील अवैध बांधकामावर न्यायालयात जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली असून १५ आॅक्टोबर रोजी पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अवैध बांधकामाची यादी तयार करण्याचे काम सुरू असतांना स्वच्छता अभियानात पालिकेच्या शौचालयांवर डल्ला मारण्यायचे प्रकार उघड झाले आहेत. यामागे नगरसेवकाचे नाव येत असल्याने आयुक्तासमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा सेक्शन विभागात शौचालय हडप झाल्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर चौकशीचे उत्तर त्यांना द्यावे लागले. त्याच प्रमाणे भाजपा नगरसेवक जमनुदास पुरस्वानी, जया माखिजा यांच्या प्रभागात शौचालय हडप होऊन कारवाई झाली नसल्याचे उघड झाले आहे. कैलास कॉलनी, गायकवाड पाडा, तानाजीनगर,भैय्यासाहेब आंबेडकरनगर आदी परिसरात शौचालये हडपून बांधकामे उभी राहिली आहेत.सुरवातीला खुले भूखंड त्यानंतर आरक्षित भूखंड, लहान-मोठे उद्याने आता शौचालयावरच भूमाफियांनी अतिक्रमणे सुरू केली आहेत. स्थानिक नगरसेवक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप होत असून त्यांनी अतिक्रमणवेळी पालिकेला तक्रार का केली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपा नगरसेवक जमनुदास पुरस्वानी यांच्या भावासह वहिनी, नगरसेवक राम चार्ली यांच्या मुलावर यापूर्वी एमआरटीपीचे गुन्हे दाखल झाली आहेत. मात्र बांधकामावर कारवाई न होता. ती जैसी थे उभी आहेत.
उल्हासनगरात शौचालये असुरक्षित
By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST