नवी मुंबई : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बँक खात्यात पैसे टाकण्यावरून लोकप्रतिनिधींमधील नाराजी कायम आहे. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला असला तरी प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला असून सर्व बिले तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत बालवाडी ते १० च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, आॅल सिझन बूट, मोजे, इत्यादी साहित्याचा पुरवठा यापूर्वी करण्यात येत होता. परंतु राज्य शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये आदेश काढून साहित्य खरेदीसाठीचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने बालवाडी ते ८ वी साठी २०१६- १७ व २०१७ - १८ या कालावधीसाठी उक्त शासन निर्णयाप्रमाणे लाभाचे हस्तांतर बँक खात्यात करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्याच धर्तीवर माध्यमिक विभागासाठी ९ वी व १० वीसाठी शालेय गणवेश, आॅल सिझन बूट, मोजे व वह्या तसेच बालवाडी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रेनकोट इत्यादी साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. दोन आठवडे हा प्रस्ताव थांबविण्यात आला होता. अखेर शुक्रवारी त्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परंतु याविषयावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शालेय साहित्य खरेदीच्या पावत्या चेक करण्याची गरज आहे. बिले तयार करण्यासाठी व वितरणासाठी कोण परिश्रम घेत होते हे तपासणेही महत्त्वाचे आहे. प्रशासनाची भूमिका योग्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणीही धुतल्या तांदळासारखा नसल्याची टीकाही हांडेपाटील यांनी केली आहे.स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली असली तरी काँगे्रसच्या सदस्यांनी याविषयी सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठविण्याची भूमिका घेतली आहे. साहित्य खरेदी एकाच ठेकेदाराकडून झाली आहे. पैसे वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. शाळा क्रमांक ४८ राबाडामध्ये ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे जमा करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप केला जात असून या विषयावर आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.पालकांना सक्तीराबाडा शाळा क्रमांक ४० मध्ये पैसे बँक खात्यात जमा केलेल्या दोन पालकांना पैसे परत देण्यासाठी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडून दबाव येत आहे. वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगितले जात असून या पालकांनी स्थानिक नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली असून याविषयी सर्वसाधारण सभेत आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी लक्षवेधीही मांडली आहे, परंतु त्यावर चर्चा घडविली जात नाही.
शैक्षणिक साहित्य खरेदीविषयी संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:25 IST