नामदेव मोरे, नवी मुंबईदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्षित राहिलेल्या दिघा धरणाला दुष्काळामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेने या धरणाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रेयासाठी राजकीय वादही सुरू झाला असून या भांडणामध्ये धरणाच्या जमिनीवरील अतिक्रमण, धरणाच्या भिंतीचे सेफ्टी आॅडिट याकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जून १८४५ मध्ये द ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीची स्थापना केली. या कंपनीने सर्वेक्षण करून मुंबई ते दिघा पहिली रेल्वेसेवा सुरू करण्याचे निश्चित केले. रेल्वेसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिघा परिसरातील इलठाण गावच्या हद्दीत धरण बांधण्यात आले. या धरणातून ठाण्यापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली. १८५३ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या रेल्वे सेवेसाठीचा पाणीपुरवठा याच धरणातून करण्यात आला. स्वातंत्र्यापर्यंत धरणाचा वापर केला जात होता. परंतु यानंतर या पाण्याची रेल्वेला आवश्यकता नसल्याने त्याचा वापर बंद झाला. जवळपास १६० वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही दुर्लक्षित राहिले होते. यावर्षी भीषण दुष्काळ पडल्यामुळे दिघा धरणातील पाण्याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे. खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून हे पाणी दिघा परिसराला मिळावे यासाठी पाठपुरावा केला. रेल्वेनेही तीन महिन्यांसाठी या पाण्याचा वापर करण्यास परवानगी दिली. आता या धरणातील पाणी ठाणे शहराला देण्याचीही घोषणा केली आहे. सोमवारी रेल्वेचे अधिकारी या धरणाची पाहणी करणार असून त्यानंतर याविषयी योग्य निर्णय घेतला जाणार आहे. दिघा धरणाच्या पाणी वापरापेक्षा त्याच्या श्रेयासाठीच सर्व राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे संजीव नाईक हे खासदार असताना त्यांनी सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाकडे या धरणासाठी पाठपुरावा सुरू केला. धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतर करण्यात यावे अशी मागणी केली होती. यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यांच्यानंतर खासदार राजन विचारे यांनी धरणातील पाणी या परिसरातील नागरिकांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनीही प्रशासनाला हे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. श्रेयाच्या वादामध्ये धरणाच्या भिंतीची मजबुती, धरण पायथ्याशी झालेले झोपड्यांचे अतिक्रमण, धरणाची सुरक्षितता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. भविष्यात धरणाच्या भिंतीला भगदाड पडले तर शेकडो झोपड्या वाहून जाण्याची शक्यता असून याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. > दिघा धरण क्षेत्रातील वास्तव चित्रधरणाच्या पायथ्याशी शेकडो झोपड्यांचे अतिक्रमण सॅटलाइट छायाचित्र असतानाही येथील अतिक्रमणावर कारवाई नाही६० वर्षांपूर्वी बांधलेल्या धरणाचे सेफ्टी आॅडिट केलेले नाहीब्रिटिशकालीन पाइपची चोरीधरणाच्या भिंतीजवळील लोखंडही कापून नेलेधरणाची भिंत कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होणारधरणाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या काठावरही अतिक्रमण धरणाच्या सुरक्षेसाठी काहीच यंत्रणा नाहीपाणी पिण्यायोग्य आहे का याचीही तपासणीही नाही जवळपास १६० वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाच्या भिंतीला तडे > रेल्वेला पडला होता विसरदिघा येथील धरण रेल्वेच्या मालकीचे असले तरी या मालमत्तेकडे प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही. धरण परिसरातील जमिनीवर अतिक्रमण होवू नये यासाठीही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. धरण सुरक्षित आहे की नाही हेही कधीच पाहिले नाही. रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर २५ एप्रिलला प्रशासन धरणाची पाहणी करणार असून आतातरी गांभीर्याने धरणाचा प्रश्न मार्गी लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिघा धरणाच्या पाण्यासाठी रस्सीखेच
By admin | Updated: April 25, 2016 03:15 IST