उरण : नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा उठवित बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. विशेषत: विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.नवी मुंबई परिवहन सेवेच्या चांगल्या सेवेमुळे उरणकरांसाठी उपयुक्त ठरु लागली आहे. या सेवाचा लाभ बहुतांश उरणकर घेत आहेत. उरणमध्ये उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थिनी, महिला उरण - वाशी या मार्गावर प्रवास करीत आहेत. यामध्ये विविध कामानिमित्ताने ये - जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. तसेच गर्दीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक महिलांना धक्काबुक्कीही करतात. शिवाय बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांचाही कटू अनुभव घेण्याची वेळ प्रवासी वर्गावर येते. त्यामुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे. (वार्ताहर)
उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2015 00:15 IST