वसई : नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितींवर वर्चस्व मिळवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकींमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपले सर्वस्वी पणाला लावतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीमध्ये आघाडी कोणत्याही राजकीय पक्षासमवेत जागा वाटपाबाबत समझोता करणार नसल्याचे वृत्त आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर केलेल्या समझोत्यामुळे त्यांना जबर फटका बसला त्या अनुभवातुन शहाणे होत बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भुमीका स्विकारली. या त्यांच्या निर्णयाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय अद्याप जाहीर केला नसला तरी त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यस्तरावर त्यांनी भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठींबा देऊ केला असला तरी या निवडणुकांमध्ये ते भाजपा बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य मंत्रीमंडळात सेना सहभागी झाली असली तरी स्थानिक पातळीवर त्यांची युती होण्याची शक्यता धुसर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसई मतदारसंघात अचानक माघार घेऊन सेना पुरस्कृत विवेक पंडीत यांना पाठींबा जाहीर केला. तरीही पंडीत यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच नालासोपारा मतदारसंघात सेना व भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे मतविभागणीचा फायदा बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांना झाला. युती झाली असली तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने अद्याप जुळलेली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकदिलाने एकमताने निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता फार कमी आहे. पालघर तालुक्यात सेनेने विधानसभा जागा जिंकुन गमावलेले वैभव पुन्हा मिळवले आहे. नगरपरिषद, पंचायत समिती व आता विधानसभेची जागा त्यांनी जिंकल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेला बेबनाव अद्याप कायम असल्यामुळे या निवडणुका यशस्वीरित्या लढवणे काँग्रेस पक्षाला अशक्य आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये आघाडी असतानाही येथील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र एकमेकांवर सतत कुरघोडी करत राहीले. काँग्रेसचे अस्तित्व बऱ्यापैकी होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र वाताहत झाली. वसई तालुक्याप्रमाणे पालघर तालुक्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणे शक्य होणार नाही. या दोन्ही तालुक्यात पक्षाची कार्यकारीणी अस्तित्वात नसल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते नसतील. डहाणू तालुक्यात एकेकाळी राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दणदणीत विजय मिळविला. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली. परंतु पक्षाचे अस्तित्व काही प्रमाणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करतील. (प्रतिनिधी)