पनवेल : पनवेल नगरपरिषदेचे रूपांतर १ आॅक्टोबर २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील पहिल्या महानगरपालिकेत झाले. १५० वर्षे जुन्या नगरपरिषदेचे रूपांतर पालिकेत झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे ‘बोधचिन्ह’ हे लोकसहभागातून व्हावे, अशी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची संकल्पना होती. या संकल्पनेतूनच पालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी ‘बोधचिन्ह’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहा बोधचिन्ह विजेत्यांची निवड के ली आहे. मात्र, पालिकेचे अंतिम बोधचिन्ह आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार अच्युत पालव हे साकारणार आहेत.पनवेल महानगरपालिकेच्या ‘बोधचिन्ह व बोधवाक्य’ या स्पर्धेसाठी २४८ स्पर्धक सहभागी झाले होता. या स्पर्धकांपैकी प्रथम पारितोषिक देण्याच्या योग्यतेचे सादरीकरण नसल्यामुळे ५ हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी ६ बोधचिन्हांची निवड केली आहे. ५ बोधचिन्हांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. यासंदर्भात पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अंतिम निवड झालेल्या सहा बोधचिन्हांचे निरीक्षण करून चित्रकार अच्युत पालव हे पालिकेचे अंतिम बोधचिन्ह साकारणार आहेत. पालिकेने याकरिता गठीत केलेल्या शिफारशीनुसार पालव यांची याकरिता निवड करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या ‘बोधचिन्ह’ स्पर्धेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:54 IST