वैभव गायकर पनवेल : उच्च न्यायालय व राज्य शासनाचे आदेश धाब्यावर बसवून, पनवेल परिसरातील उड्डाणपुलांखाली अनधिकृत पार्किंग सुरू आहे. भंगार दुकानांसह, पोलीस चौक्या व भिकाºयांनी पुलाखाली अतिक्रमण केले आहे. पुलांची सुरक्षा धोक्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत.नवी मुंबईमधील तुर्भे वाहतूक पोलीस चौकीजवळ उड्डाणपुलाखाली दुहेरी हत्याकांड घडले आहे. यानंतर नवी मुंबई, पनवेल परिसरातील उड्डाणपुलाखाली सुरू असलेले अवैध व्यवसाय व पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाने २००८मध्येच पुलांखाली अनधिकृत पार्किंग करण्यास मनाई करण्याचा आदेश दिला आहे. घातपाती कारवाई होण्याची भीती असल्याने पुलाखाली वाहने उभी केली जाऊ नये, असे आदेश देण्यात आले होते. राज्य शासनानेही याविषयीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए व संबंधित अस्थापनांना दिले आहेत; परंतु या आदेशांचे पालन केले जात नाही. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील वाशी, तुर्भे व सीबीडी पुलाखाली वाहतूक पोलीस चौकी आहे. कारवाई केलेली वाहने पुलांखाली ठेवली जात आहेत. याप्रमाणेच पनवेल परिसरातील पुलांखालीही अनधिकृत पार्किंग सुरू आहे. खारघरमध्ये पोलीस चौकीच पुलाखाली असल्याने टोइंग करून आणलेली व अपघातग्रस्त वाहनेही पुलाखालीच उभी केली जात आहेत. पोलिसांनीच नियम धाब्यावर बसविले आहेत. पनवेल परिसरातील सर्वच पुलांखाली अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. भिकाºयांनीही पुलाखाली आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. ‘बेघर नागरिकांचे हक्काचे घर’ असे स्वरूप उड्डाणपुलांना येत आहे. पुलाखाली चुली पेटविल्या जात आहेत. भंगारदुकाने सुरू करण्यात आली आहेत.उड्डाणपुलांखालील जागेची धर्मशाळा झाली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण पुलांखाली आश्रय घेत आहेत. भिकाºयांची भांडणे सुरू असतात. पुलाखालील जागेवर घाणीचे साम्राज्य पसरू लागले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर येऊ लागला आहे. तळोजा लिंकरोडजवळील पुलाखाली ठेकेदाराने गोडाऊन बनविले आहे. बांधकामासाठी आवश्यक साहित्य तेथेच ठेवण्यात आले आहे. वास्तविक २००८मध्येच पुलाखालील जागेवरील अतिक्रमण काढण्याचे व पार्किंग न करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर राजभोज तोरणे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून, मुंबईतील पुलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान आॅगस्ट २०१२मध्ये उच्च न्यायालयाने राज्य शासनावर कडक ताशेरे ओढले होते; परंतु या कशाचाही परिणाम राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनावर झालेला नाही. पुलांच्या सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नसून, भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कळंबोलीमध्ये भिकाºयांचा अड्डाकळंबोली उड्डाणपुलाखाली शेकडो भिकाºयांनी आश्रय घेतला आहे. पुलाखाली सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरू लागली आहे. भिकारी व बेघरांमुळे नेहमीच येथे गोंधळाचे वातावरण असते.अनेक वेळा त्यांची आपसात भांडणे होत असल्याचे पाहावयास मिळते.ठेकेदाराने बनविले गोडाऊनतळोजा लिंक रोडजवळील उड्डाणपुलाखालील जागेचा वापर सायन-पनवेल टोलवेज कंपनीने त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. भंगार गोडाऊनप्रमाणे पुलाखालील जागेचा वापर सुरू असून या पुलाच्या सुरक्षेसाठीही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. भंगाराची दुकाने थाटलीपनवेलमधील महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुलाखाली अनधिकृतपणे भंगार दुकाने थाटण्यात आली आहेत. भिकाºयांनीही पुलाखाली मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला आहे. नियम धाब्यावर बसवून पुलाखालील जागेला धर्मशाळेचे स्वरूप देण्यात आले आहे. खारघरमध्ये अनधिकृत पार्किंगमहामार्गावर खारघर उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांची चौकी आहे. पोलिसांनी कारवाई केलेली वाहने पुलाखाली उभी केली जात आहेत. शेकडो वाहने बेवारसपणे येथे पडली असून, आग लागल्यास वाहनांमधील पेट्रोलचा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय येथे घातपाती कारवाई करण्याच्या उद्देशानेही वाहने उभी केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पनवेलमधील उड्डाणपुलांची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:31 IST