नवी मुंबई : आचारसंहितेनंतर प्रस्तावित करण्यात आलेली एनएमएमटीची संभाव्य भाडेवाढ स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून परिवहन समितीतील सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी या भाडेवाढीला विरोध दर्शविल्याचे बोलले जात आहे. अपुरा कर्मचारीवर्ग व नियोजनशून्य कारभारामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला (एनएमएमटी) दरमहा सुमारे अडीच कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन व्यवस्थापनाने तिकीट दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले होते. सदरचा प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) मान्यतेसाठी पडून होता. परिवहन प्राधिकरणाने त्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसर्या दिवसापासून ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र या भाडेवाढीचे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवर परिणाम होऊ नयेत, या हेतूने परिवहन समितीतील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तूर्तास ही भाडेवाढ स्थगित ठेवण्याच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्याचे समजते. त्यामुळे उपक्रमाची कोंडी झाली आहे. भाडेवाढ लागू केली नाही तर एनएमएमटीचा गाडा हाकणे जिकिरीचे होईल, अशी भीती व्यवस्थापनाला वाटत आहे. उपक्रमाने यापूर्वी २५ सप्टेंबर २०१२ रोजी तिकीट दरात वाढ केली होती. त्यावेळी डिझेल ४४.२९ प्रति लिटर तर सीएनजी प्रतिकिलो ३३.४१ रुपये होते. सध्या डिझेल ६७ रुपये तर सीएनजीमध्ये प्रति किलोमागे ६.०३ रुपये वाढ झाली आहे. उपक्रमाला सर्व उत्पन्न मिळून मासिक उत्पन्न ७६४.०३ लाख रुपये मिळत आहे. मासिक खर्च यांचा ताळमेळ केला असता मासिक तोटा अडीच कोटी रुपये इतका होतो. प्रति किमी उत्पन्न ३५.३७ रुपये आणि खर्च प्रति किमी ४३.४६ रुपये असल्याने उपक्रमास प्रति किलोमीटर ८.०९ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढ केली नाही तर उपक्रम अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात एनएमटीचे व्यवस्थापक शिरिष आदरवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
एनएमएमटीची भाडेवाढ स्थगित?
By admin | Updated: May 15, 2014 00:02 IST