जलसंपत्ती दिन विशेष |
शहरातील ४२ विहिरी गायब : तलावांच्या पाण्याचाही होत नाही वापर, दिघा धरणातील जलसाठाही निरुपयोगी प्राची सोनावणे■ नवी मुंबई राज्यात सर्वात मुबलक पाणी नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, विहीरी, तलाव अशी समृद्ध जलसंपत्ती लाभली आहे. परंतू या पाण्याचा काटेकोर वापर करण्याचा विसर पडला आहे. मोठय़ाप्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. शहरातील १३२ पैकी ४२ विहीरी गायब झाल्या आहेत. नवी मुंबईमध्ये एमआयडीसीचा परिसर वगळून रोज नियमीत पाणीपुरवठा केला जात आहे. २५ टक्के पाणी कपात केली जात असली तरी दिवसभर पुरेल एवढे पाणी सर्वांना मिळत आहे. राज्यात सर्वाधीक जलसंपत्ती नवी मुंबईमध्ये आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहीरी, २४ तलाव, दिघामध्ये रेल्वेचे धरण आहे. याशिवाय मलनिस:रण केंद्रातील पाण्यावरही प्रक्रिया केली जात आहे. कितीही दुष्काळ पडला तरी शहराला पुरेसे पाणी मिळू शकते. परंतू महापालिका प्रशासनाने पाण्याचा काटेकोर वापरण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. पिण्यासाठी, व्यवसाय व बांधकामासाठीही मोरबे धरणाचे पाणी अनेक वर्षांपासून वापरले जात आहे. यामुळे दुष्काळामध्ये २५ टक्के पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. राज्यभर पाण्याची स्थिती गंभीर असताना अद्याप नागरीकांकडूनही उधळपट्टी सुरूच आहे. विहीरी व तलावांमधील पाण्याचा वापर केला जात नाही. नैसर्गीक पाण्याचे स्त्रोत मिटविण्याचा प्रयत्न होवू लागला आहे. शहरामध्ये १३२ विहीरी होत्या. परंतू आता फक्त ९0 विहीरीच शिल्लक राहिल्या आहेत. यामधील प्रत्यक्ष पाण्याचा वापर करता येईल अशा २४ विहीरीच राहिल्या आहेत. ४२ विहीरी बुजविण्यात आल्या आहेत. बेलापूरला विहीर बुजवून इमारत उभारण्यात आली होती. ती इमारत पडल्याने दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. नेरूळमध्ये एक मोठय़ा संस्थेने त्यांच्या आवारातील दोन विहीरी बुजविल्या आहेत. विहीरींची नियमीत देखभाल दुरूस्ती केली असती तर शहरातील बांधकाम व इतर व्यवसायासाठी त्याचा वापर करता आला असता. महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल २४ तलाव आहेत. २ लाख २३ हजार ६६१ चौरस मिटर क्षेत्रफळ तलावांनी व्यापले आहे. पाणी खाडीत..महापालिका शहरातील १८0 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत आहे. शुद्ध केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीत सोडून दिले जात आहे. या पाण्याचा योग्य वापर केला तर पिण्याचे पाण्याचा अपव्यय टाळल्यास पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही. वापरात असलेल्या विहिरीठिकाणसंख्याबेलापूर गाव२शहाबाज१किल्लेगावठाण१नेरूळगांव१सारसोळे२करावे २कुकशेत१तुर्भे स्टोअर्स२सानपाडा३तुर्भेगाव३इंदिरानगर१गणपतीपाडा१तुर्भे सेक्टर २११ विहिरी कोणी बुजविल्या : नवी मुंबईमध्ये १३२ विहीरी असल्याचा उल्लेख महापालिका करते. परंतु प्रत्यक्षात मात्र ९0 विहिरी आढळून आल्या आहे. उर्वरित विहिरी कोणी बुजविल्या याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ज्या विहिरी सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहेत, त्यामधील गाळ काढला पाहिजे. बांधकाम व इतर व्यवसायासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो |
नवी मुंबईत होतेय पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 14:16 IST