कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर १० येथे महानगर टेलिफोन निगमचा मालकी हक्क असलेल्या इमारती गेली दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मोकळ्या आहेत. त्याचा पुनर्विकास करण्यात येत नसल्याने ही घरे धूळ खात पडून आहेत. या परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे.या एमटीएनएल कॉलनीतील जवळपास सगळ्या इमारती ओस पडल्या. त्यात २६ जुलै २००५ साली आलेल्या महाप्रलयाच्या फटका या इमारतींना बसला. त्यामुळे गेल्या वर्षीपासून या इमारती आणि घरे धूळ खात पडली आहेत. डागडुजी आणि देखभाल होत नसल्याने या इमारती मोडकळीस आल्या आहेत. साफसफाई न झाल्याने आजूबाजूला गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत.पावसाळ्यात तर एक प्रकारचे जंगलच निर्माण होते. त्यामुळे त्याचा आजूबाजूच्या रहिवासी इमारतींना त्रास होत आहे. डास, साप, विंचवांचा वावर वाढल्याने बाजूच्या रहिवाशांसाठी भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. सेक्टर-१० येथील स्वच्छतेचा बोजवाराही उडत चालला आहे. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सातत्याने मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत. या इमारतींची पुनर्बांधणी एमटीएनएलने करावी ज्यामुळे या परिसराचा लूक बदलेल, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात कळंबोली येथील एमटीएनएल कार्यालयात संपर्क साधला असता प्रतिक्रि या मिळू शकली नाही.
कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव
बंद असलेल्या या इमारतीत दोन सदनिकांमध्ये एमएटीएनल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यादृष्टिकोनातून कॉर्नरच्या इमारतीत साफसफाई करण्यात आलेली आहे. चार कामगार येथे रहात आहेत, तसेच तीन सुरक्षारक्षकांची येथे नेमणूक करण्यात आली आहे. कार्यालय सुरू केल्यानंतर हा परिसर काही अंशी स्वच्छ राहील, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे. सहाही इमारतींच्या आवारातील झाडेझुडपे काढून साफसफाई करावी, अशी मागणी ही सेक्टर-१० मधील रहिवाशांची आहे.वेगवेगळ्या लहान लहान कॉलनी तयार झाल्या. कळंबोलीतील सेक्टर १० मध्ये एमटीएनएलने एकूण सहा इमारतीतील ९६ घरे विकत घेतली.