अलिबाग : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या महत्त्वाच्या २८ मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे ८५० कर्मचारी सहभागी झाले होते. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये ३०० कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे १५ तहसील कार्यालयांमध्येही काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक, कोतवाल, शिपाई अशा सर्व संवर्गांतील सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र हे काम बंद आंदोलन १०० टक्के यशस्वी झाले असल्याचे सावंत यांनी सांगितले.अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक, कोतवाल, शिपाई अशा सर्व संवर्गांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी अगदी मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन निर्णय झाले, परंतु त्यापुढील कार्यवाही मात्र झाली नाही. शासनाने आपल्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी, याकरिता संघटनेच्या माध्यमातून गेल्या १० मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यावर कारवाई झाली नसल्याने गेल्या २२ मार्च रोजी काळ््या फिती लावून काम करून शासनाच्या निषेधाचे आंदोलन करण्यात आले. त्यावरही शासनाकडून कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणून गेल्या १ एप्रिला दुपारच्या भोजनाच्या सुटीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचीही दखल शासनाने घेतली नाही म्हणून संघटनेच्या राज्यस्तरीय निर्णयानुसार बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवारच्या या धरणे आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर अखेर येत्या १ मे या महाराष्ट्र दिनी मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन तर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याची माहिती सावंत यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 02:31 IST