नवी मुंबई : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी शहरात पाणी पाणी झाले होते. काही विभागांत घरांमध्ये पाणी घुसले होते, तर काही ठिकाणचे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या नवी मुंबईकरांना घराबाहेर मात्र काहीसा त्रासही सहन करावा लागला.काहीशा उशिराने का होईना परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईकर सुखावला आहे. परंतु शनिवारी मात्र कोसळलेल्या मुसळधार धारांनी चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे नोकरवर्गाला आठवड्याचा शेवटचा दिवस भिजतच कामावर जावे लागले. पावसासह वाराही असल्यामुळे सोबत छत्री बाळगून असणाऱ्यांचेही हाल झाले. शिवाय शहराच्या अनेक भागांत पाणी साचून रहिवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. एपीएमसी मार्केट, वाशी रेल्वे स्थानक परिसर, कोपरखैरणे, घणसोली, तळवली तसेच ऐरोली, नेरूळ व सीबीडीच्या काही रहिवासी भागात पाणी तुंबले होते. सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या वाशी रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते जलमय झाले होते. परिसरातील नाले व गटारे तुंबून त्यामधील पाणी रस्त्याने वाहत होते. मागणी करूनही नाले व गटारांची सफाई न झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचल्याचा संताप लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. तर घणोसली येथील चिंच आळी व तळवली नाका परिसरात अनेक घरांमध्ये पाणी घुसून तळे निर्माण झाले होते. घरामध्ये घुसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे फर्निचर व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती एमआयडीसी क्षेत्रात देखील उद्भवली होती. डोंगरभागातून वाहणाऱ्या पाण्यामुळे नाले तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाय तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यातही पाणी घुसले होते. हे पोलीस ठाणे प्रतिवर्षी पावसाळ्यात जलमय होत असेत. त्यावर अनेक उपाययोजना करूनही पोलीस ठाण्यात पाणी घुसायचे थांबलेले नाही. यामुळे सालाबादप्रमाणे पोलिसांना पाण्यात खुर्च्या मांडून दैनंदिन कामकाज करावे लागले. परंतु पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने त्या ठिकाणी असलेल्या वाहनांचे नुकसान झाले. एपीएमसी फळ मार्केट व इतर काही मार्केटच्या प्रवेशद्वारावरच पाण्यात बुडालेले होते. शिवाय वाहत्या पाण्याबरोबर मार्केटमधील टाकाऊ फळे व भाजीपाला रस्त्यावर येऊन साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेप्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेलाही पावसामुळे दणका बसला. रेल्वेरुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. पनवेल ते सीएसटी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने अनेकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. फलाटांवरही पाणी साचल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. शनिवारी सकाळ साडेआठ ते दुपारी पाच वाजेपर्यंत बेलापूर येथे ८४.० मिमि, नेरुळमध्ये ९०.०मिमि, वाशीत ९१.३ मिमि, ऐरोलीत ९७.० एकुण ९०.५७ मिमि पावसाची नोंद झाली. मोरबे धरणाची पातळी ६३.७० मीटर इतकी आहे.शुक्रवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून, नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत, तर ५० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. आपत्कालीन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या वतीने त्वरित मदत पोहोचवून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दखल घेण्यात आली.
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: June 26, 2016 00:48 IST