नवी मुंबई : वाशी नियोजित महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी पाहणी गेली. कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्यांच्या निवासाची अडचण दूर करण्यासाठी शहरात महाराष्ट्र भवनची निर्मिती होणे आवश्यक आहे, असल्याचे मत यावेळी आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केली. सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ सेक्टर ३०ए येथे भवन निर्मितीसाठी देशातील बहुतांश राज्य सरकारांना भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. नियोजित महाराष्ट्र भवनसाठीचा सिडकोने १९९८ साली आरक्षित केलेला सुमारे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड आजतागायत मोकळा पडून आहे. सध्या या भूखंडाचा वापर वाहन पार्किंगसाठी किंवा विविध महोत्सवांसाठी करण्यात येतो, याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या भूखंडावर राज्य शासनाच्या माध्यमातून नियोजित महाराष्ट्र भवन उभारल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातून मुंबई येथे शासकीय अथवा इतर कामासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला हक्काचे शासकीय विश्रामगृह प्राप्त होईल. या भवनात स्थानिक प्रकल्पग्रस्त व इतर महिला मंडळे, बचतगट यांच्या उत्पादनांना बाजारपेठही उपलब्ध करून त्यांना रोजगाराची संधी देण्याची कल्पना आमदार म्हात्रे यांनी यावेळी मांडली. या भूखंडावर नियोजित महाराष्ट्र भवन उभारणीचा लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठीही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच महाराष्ट्र भवन नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केले आहे. या पाहणी दौऱ्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांसोबत सिडकोचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत सामदसानी, भाजपाचे पदाधिकारी डॉ. राजेश पाटील, गोपाळराव गायकवाड, श्रीराम घाटे, संतोष पळसकर, दामोदरन पिल्ले, प्रमिला खडसे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र भवनची वास्तू लवकरच !
By admin | Updated: June 1, 2016 03:02 IST