नवी मुंबई : बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३८२ मुले व ५६९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक तर तीन महाविद्यालयांचा १०० टक्के लागला आहे.राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागून राहिलेला बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. तूर्तास आॅनलाइनवर विद्यार्थ्यांना हा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला असून छापील गुणपत्रक ३ जूनला दिले जाणार आहे. नवी मुंबईतून फ्रेश व रिपीटर अशा तब्बल १४ हजार १७८ विद्यार्थ्यांनी विविध शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७८५९ मुले तर ६३१९ मुलींचा समावेश होता. त्यांच्यापैकी ६३८२ मुलांनी व ५६९१ मुलींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.६६ टक्केने राज्याचा निकाल घसरला आहे. त्यामध्ये सर्वाधिक घसरण कला शाखेतल्या निकालाची झाली आहे. असे असले तरीही उत्तीर्ण होण्यामध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही राज्यासह नवी मुंबईतही मुलींनी बाजी मारली आहे.मागील काही वर्षांत नवी मुंबई देखील विद्यानगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे. नवी मुंबई परिसरात महाविद्यालयांचे जाळे पसरले असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शैक्षणिक संस्था व त्यामधील शिक्षक हे देखील प्रयत्न करत असतात. अशा २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक लागलेला आहे, तर तीन महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागात ५१८ मुख्य व २५ उपकेंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेदरम्यान २१ विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याचे मुंबई विभागीय अध्यक्ष डी. जगताप यांनी सांगितले.
नवी मुंबईतही मुलींची बाजी
By admin | Updated: May 26, 2016 02:56 IST