नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात. गणेश उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. साध्यापद्धतीने उत्सव साजरा करताना प्रबोधनाचा वारसाही जपला जात आहे. दिवसभर गोणी उचलण्याचे काम करणारे माथाडी कामगार बाजारपेठा मुंबईत असल्यापासून गणेश उत्सवाचे आयोजन करत आहेत. कांदा - बटाटा मार्केटमधील अण्णासाहेबत पाटील सांस्कृतीक सेवा मंडळाच्यावतीने ३६ वर्षापासून उत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी राज्यभर दुष्काळ असल्यामुळे कामगारांनी देखाव्यांवर खर्च केला नाही. गणरायासमोर रोज भजनाचे आयोजन केले जात असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाणी बचत व दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. दैनंदिन काम करून माथाडी कामगार गणरायाची सेवा करत आहेत. कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, अध्यक्ष पोपट पवार, सचीव गुंगा पाटील, शामराव जाधव, विठ्ठल धनावडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. व्यापारी, मेहता, वाहतूकदार सर्वच उत्सवामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. मसाला मार्केटचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णासाहेब पाटील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माथाडी हॉस्पीटलमधील रूग्णांना मदत, महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ, नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठीचे उपक्रम राबविले जात आहेत. अध्यक्ष सखाराम शेलार, उपाध्यक्ष संतोष अहिरे, नामदेव चिकणे, संतोष धोंडे व इतर पदाधिकारी गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. धान्य मार्केटमध्ये गणेश उत्सव मंडळाने माथाडी रूग्णालयास एक लाख रूपये दिले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मदत व दुष्काळग्रस्तांनाही मदत करण्याचे निश्चीत केले आहे.
माथाडी कामगार रमलेत गणेशभक्तीत
By admin | Updated: September 21, 2015 03:10 IST