नवी मुंबई : वाशी ते उरण या मार्गातील प्रवासी संख्या तसेच यातून होणाऱ्या फायद्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी विभागातून संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे. कोपरखैरणेतून उरणकडे जाणाऱ्या ३१ क्रमांकाच्या बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात जादा बसेस सोडल्या जाव्यात अशी मागणी एनएमएमटीकडे केली. संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान या एखादी बस जरी हुकली तरी प्रवाशांना तासभर बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. उरण उत्कर्ष समितीच्या मागणीची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय झाला. चालक, वाहक कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. उरण उत्कर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी याबाबत मागणी करुन एनएमएमटीच्या वतीने चांगल्या सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)
उरण विभागासाठी अतिरिक्त बस
By admin | Updated: December 8, 2015 01:00 IST