मुंबई : स्वाइन फ्लूच नव्हे, तर साथीच्या अन्य रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल कायदा लवकरच करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.स्वाइन फ्लूवरील लक्षवेधी सूचना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीपासून रेंगाळली होती. शेवटी आज त्यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ, शरद सोनावणे, गुलाबराव पाटील, डॉ. सतीश पाटील, मेधा कुलकर्णी, दीपिका चव्हाण आदी सदस्यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. आरोग्य महासंचालक सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. ही समिती कायद्याचे प्रारूप तयार करेल. एनआयव्ही, एम्स यासारख्या संस्था या यंत्रणांना मार्गदर्शन करतील. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आरोग्य विभाग या तीनही यंत्रणा अशा संकटकाळात एकाच छताखाली काम करतील, असे सावंत म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, अजित पवार यांनी स्वाइन फ्लू रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. स्वत: डॉक्टर असलेले सावंत यांनी सदस्यांचे या रोगाबद्दलचे अज्ञान दूर करताना सरकारी उपाययोजनांची माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी) या रोगामुळे आतापर्यंत २९३ जण राज्यात दगावले आहेत. त्यात सर्वाधिक ५१ हे नागपुरातील आहेत. या रोगावरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या टॅमी फ्लूच्या दोन लाखांहून अधिक गोळ्या उपलब्ध आहेत. ग्रेड ए च्या रुग्णांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांत ३०० व्हेंटिलेटरची सुविधाही देण्यात आली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. होमीओपॅथीची मात्रा स्वाइन फ्लूवर लागू पडते, असा कुठलाही अहवाल तज्ज्ञांच्या संस्थेने आपल्याला दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. साथीच्या रोगांचा समावेश राजीव गांधी जीवनदायी योजनेत करण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
इमर्जन्सी मेडिकल कायदा करणार
By admin | Updated: March 17, 2015 01:19 IST