नवी मुंबई : महावितरणच्या उघड्या डीपीमधून वीजचोरी होताना दिसत आहे, त्यामुळे रस्त्यालगत उघड्यावर पडलेल्या डीपी वीजचोरांसाठी खुले निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. अशा वीजचोरीची प्रकरणे उघड करण्यासाठी रात्रीच्या वेळीही भरारी पथकांमार्फत पाहणीची मागणी होत आहे.
महावितरणकडून वीजचोरी उघड करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार मागील काही दिवसांमध्ये बिलाचा भरणा न केल्याने वीज खंडित केल्यानंतरही चोरीची वीज वापरणाºया ग्राहकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, मोठ्या स्वरूपाच्या वीजचोरीकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे. असाच प्रकार कोपरखैरणेतील बालाजी थेटर समोरील मार्गावर दिसून येत आहे. त्या ठिकाणी रस्त्यालगतचा डीपी खुला ठेवण्यात आला आहे. याचा पुरेपूर फायदा वीजचोरांकडून घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी या डीपीमध्ये वायरची जोडणी करून चोरीच्या विजेचा वापर होत आहे. मात्र, ही वीज नेमकी कुठे वापरली जाते याचा उलगडा होऊ शकलेला नाही. परिसरात काही विकासकामे सुरू असून अनधिकृत झोपड्यांचेही साम्राज्य आहे.
तिथल्या व्यक्तींकडून ही वीजचोरी होत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दररोज रात्री डीपीमध्ये वायर जोडून रात्रभर विजेचा वापर केल्यानंतर सकाळी ती काढली जाते, असा प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे. तर त्यांना वीजचोरीला रान मोकळे करून देण्याच्या उद्देशानेच तिथला डीपी उघडा ठेवण्यात आला असल्याचाही आरोप होत आहे; परंतु अशा वीजचोरीच्या प्रयत्नात शॉक लागून एखाद्या व्यक्तीचे प्राण गमावण्याची शक्यताही आहे. शिवाय, अशा वीजचोरीमुळे परिसरातील सामान्य वीजग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे डीपीमधून होणारी वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे रात्रीच्या वेळीही धडक कारवाया करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.