नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. नाल्यावरील मोरी तोडून त्याठिकाणी आरसीसी पध्दतीने बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे बांधकाम चुकीचे असून नाला बांधून पूर्ण झाल्यानंतर शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नाला एक मीटर वर बांधवा, याबाबत बांधकाम विभागाला निवेदन, सूचना करण्यात आल्या आहेत. ठेकेदाराच्या मनमानीला संबंधित अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप उंबरखांड येथील शेतकरी नारायण गणपत पाटील यांनी केला आहे.कळंब-बोरगाव रस्त्यालगत उंबरखांड गावाजवळ नारायण पाटील यांची सर्व्हे नंबर ५५/ अ ही जमीन मिळकत आहे. नाल्याच्या पाण्यामुळे त्यांच्या शेतीचे दरवर्षी नुकसान होते. बांध बांधला तरी तो वाहून जात असल्याने पाणी शेतात घुसते. त्यामुळे हा नाला एक मीटर अंतर सोडून वर बांधावा, अशी मागणी पाटील यांनी बांधकाम खाते व कर्जत तहसीलदारांकडे केली आहे. नाल्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे साडेअकरा लाख रु पये खर्च करून आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. नाला बांधताना बांधकाम खात्याने शेतकऱ्याला पूर्वकल्पना न देता खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपअभियंता एस.एम. ढिलपे यांच्याकडे पाटील यांनी शेतीच्या नुकसानीबाबत तक्रार केली. तेव्हा सरकारी कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कळंब-बोरगाव दरम्यानच्या बहुतांश रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोऱ्याही तुटलेल्या आहेत.
आरसीसी नाल्यामुळे शेतीचे नुकसान
By admin | Updated: April 22, 2016 02:04 IST