नवी मुंबई : जवळपास दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी शहरात पुन्हा हजेरी लावली. मोरबे धरण परिसरातही सायंकाळी पाऊस पडल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली होती. यावर्षी पाऊस चांगला होईल असे वाटत असताना जुलैपासून पावसाने राज्यात सर्वत्र दडी मारली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गतवर्षी १० सप्टेंबरपर्यंत २४९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा फक्त १३९० मिलीमीटरची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे स्वत:च्या मालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेसही पाण्याची बचत करण्याचे आवाहन करावे लागले होते. या महिन्यात तरी भरपूर पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मोरबे धरण परिसरातही यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अद्याप धरणात पुरेसा साठा झालेला नाही.
पावसाच्या शिडकावामुळे शहरात गारवा
By admin | Updated: September 11, 2015 01:40 IST