नवी मुंबई : एपीएमसी परिसरात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यांसह ५० मोबाइल जप्त करण्यात आले आहेत, तर सराईत गुन्हेगारांच्या या टोळीकडून १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.एपीएमसी आवारात घरफोडीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हीच बाब हेरून रात्री तसेच भरदिवसा त्याठिकाणी घरफोड्या होत आहेत. घरफोडींना आळा घालण्यासाठी उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उल्हास कदम हे परिसरात रात्र गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद वावरणाऱ्या चौघांना अडवले असता, ते घरफोडीच्या तयारीत असल्याचे उघड झाले. इम्रान खान (२१), रवी वारागडे (१९), कृष्णा चव्हाण (२७) व अनिल कानागळे (२८) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)
घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक
By admin | Updated: September 9, 2015 00:07 IST