- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात गाळ साचल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार धरणातील गळती बंद करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने दररोज किमान दीड ते दोन एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता देहरंग धरण विकसित केले आहे. एकूण १५ किमी अंतरावर असलेल्या धरणात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा विचार करता भविष्यात परिसराची तहान वाढणार आहे. देहरंग धरणात गाळ बसला असून गळतीही लागल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात धरण लवकर कोरडे पडते. यंदा पाटबंधारे खात्याकडून धरणाच्या सुरक्षेबाबत लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी पाणीबचत व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाची गळती थांबविण्याची सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती थांबविण्याचे काम हाती घेतले.दोन महिन्यांपासून गळती बंद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे धरणाची सुरक्षितता अबाधित राहीलच त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टळेल, असा विश्वास पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर.आर. तायडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.