अकोला : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शहराच्या मुख्य २२ रस्त्यांवरील विद्युत खांब हटवण्यासाठी महापालिका प्रशासनाने ३0 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करीत सोमवारी शासनाकडे पाठवला. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर येऊन ठेपली असून, येत्या २६ फेब्रुवारी रोजी मनपा अधिकारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करणे नितांत गरजेचे झाले आहे. खड्डय़ांच्या समस्येला अकोलेकर वैतागले असतानाच मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील विद्युत खांबांमुळे रुंदीकरणाच्या कामाला खीळ बसली आहे. प्रशासनाने डांबरी रस्त्यांची अनेकदा दुरुस्ती केली; परंतु रस्त्यांवर विद्युत खांब कायम असल्याने दुरुस्तीला तसेच वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. सदर विद्युत खांब हटवण्यासाठी मनपाने महावितरणला अनेकदा पत्रव्यवहार केला. त्यावर महावितरणने जानेवारी महिन्यात २२ रस्त्यांवरील विद्युत खांबांचे सर्वेक्षण करीत खांब हटवून जमिनीखालून वीज वाहून नेण्यासाठी २४ कोटींचा खर्च प्रस्तावित केला. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता मनपाला तात्काळ रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करायची आहे. विकासकामे सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील विद्युत खांब हटल्यास मनपाचा मार्ग मोकळा होईल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले असताना हा मुद्दा खासदार संजय धोत्रे,आमदार गोवर्धन शर्मा यांसह विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्यांनी त्यांच्यापुढे मांडला होता. यावर विद्युत खांब हटवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत मनपाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३0 कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला असून, येत्या २६ फेब्रुवारी रोजी प्रस्तावाच्या मुद्दय़ावर मनपा अधिकारी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने आरोपीचा कोठडीत मृत्यू
By admin | Updated: February 24, 2015 01:12 IST