अंबरनाथ : गेल्या पाच वर्षांपासून येथील पश्चिम भागातील गांवदेवी मंदिर येथून चिंचपाडा कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी करून ती देखील ती होत नसल्याने शुक्रवारी स्वाभिमानी संघटनेने पालिकेसमोर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलन करून लाक्षणिक उपोषण केले. पालिकेने प्राधान्याने दुरुस्ती करण्याचे लेखी पत्र दिल्यावर हे आंदोलन मागे घेतले. हा रस्ता रहदारीचा असतांनाही त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पालिकेने केलेले नाही. काँक्रीटीकरणाला विलंब होत असल्याने किमान या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि शहर संघटक विकास सोमेश्वर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र निधी अभावी दुरुस्तीची अडचण आल्याने स्वाभिमान संघटनेने या रस्त्याच्या कामासाठी भीक मांगो आंदोलन केले. पालिका कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी सर्व रिक्षा चालक आणि नागरिकांकडून भीक मागत निधी गोळा केला. यानंतर या आंदोलनाची काही वेळातच दखल घेऊन अंबरनाथच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, बांधकाम सभापती सदाशिव पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता मनिष भामरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना हा रस्ता निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानचे रेवण शिंदे, राहुल सोमेश्वर, प्रशांत चंदनशिव यांच्यासह गावदेवी ते करिम बिल्डींग भागातले स्थानिक रहिवासीही उपस्थित होते.(प्रतिनिधी)
रस्ता दुुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलन
By admin | Updated: December 12, 2015 01:38 IST