पेण : तालुक्यातील बेलवडे गावाची निवड राज्याच्या आदर्श गाव योजनेत झाल्याचे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांनी बुधवारी सकाळी बेलवडे गावकऱ्यांच्या घेतलेल्या ग्रामसभेत जाहीर केले.पोपटराव पवारांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. आदर्श गाव योजनेची सर्व निकषांची पूर्तता झाल्याने गावच्या शिवारातील उपजत संसाधनावर श्रमदान व शासकीय आर्थिक पाठबळाच्या आधारे गावाची उन्नतीच्या दिशेने प्रगतीचे पाऊल टाकण्यास गाव सज्ज झाले आहे. याची खात्री पटल्यावर गावकऱ्यांच्या सांघिक एकता व श्रमशक्तीच्या पाठबळावर पोपटराव पवार यांनी ग्रामसभेत आदर्श गाव योजनेत बेलवडे गावाची निवड जाहीर करून गावकऱ्यांना सुखद धक्का दिला. बेलवडे ग्रामसभेत आदर्श गाव निवड कार्यक्रमाची ग्रामसभा नियोजित वेळेनुसार सुरू झाली. बेलवडे गावाची विकासात्मक कामाची रुपरेषा महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंड यांच्याकडे सुपूर्द केली असून या संस्थेचे सर्व कर्मचारी येत्या एप्रिल २०१६ पर्यंत गावाच्या शिवारातील विकासकामांची रुपरेषा आराखडा बनवतील. ११ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्राला १ कोटी १० हजारांचा विकासनिधी व ग्रामस्थांचे श्रमदान यावर आधारित या गावच्या शिवारात जलयुक्त शिवार, पाण्याचे नियोजन, कृषीतंत्रज्ञानावर आधारित पिके, योजनेची सात सूत्रे, परस्पर सहकार्य भावना, जंगलाचे संवर्धन, इंटरनेट प्रणाली या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गाव आदर्श बनवायचे आहे. याबाबतीत सखोल मार्गदर्शन पोपटराव पवारांनीकेले.हनुमान मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या ग्रामसभेत व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, योजनेचे उपसंचालक, बी. आर. कराळे, अधीक्षक कृषी अधिकारी तरकसे, सुरेशचंद्र वारगडे, उपविभागीय कृषी अधिकारी ढवळे आदींसह शासकीय अधिकारी व कर्मचारीवर्गाशिवाय आदर्श गाव योजनेचे बेलवडे गावाचे पदाधिकारी कृष्णा पाटील, उपसभापती पेण हरेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हरेश पाटील, परशुराम पाटील आदी सदस्य उपस्थित होते.(वार्ताहर)
‘आदर्श गाव’साठी बेलवडेची निवड
By admin | Updated: October 1, 2015 01:56 IST