सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर वापरणाऱ्यांना नोटिसा बजावून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेच्या या तुघलकी भूमिकेमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. अगोदरच नळाला पाणी कमी, त्यात मोटरही जप्त होणार या भीतीने रहिवाशांच्या तोंडचे पाणी देखील पळाले आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सध्या विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून सर्व्हे केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी थेट नळाला जोडलेल्या विद्युत मीटरचा शोध घेवून, संबंधित घरमालक अथवा सोसायट्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. तसेच मोटर आढळल्यास ती जप्तही केली जात आहे. ‘वॉक विथ कमिशनर‘ या उपक्रमादरम्यान ऐरोलीकरांनी आयुक्तांपुढे ही समस्या मांडली होती. पाण्यासाठी विद्युत मोटरचा वापर होत असल्यामुळे इतरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार त्यावेळी अनेकांनी केली होती. याची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोटर वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागनिहाय कारवाया केल्या जात आहेत. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी व सोसायट्यांमध्ये जावून पाहणी करत आहेत. यामुळे काही रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी, इतरांनी मात्र कारवाईचा धसका घेतला आहे. महापालिकेची गाडी अथवा एखादा अधिकारी चाळीतून जाताना दिसला तरी, रहिवाशांना धडकी भरत असल्याचे कोपरखैरणे, वाशी व ऐरोलीत पहायला मिळत आहे. समोरून जाणारी व्यक्ती मोटरच जप्त करायला आलेली असावी, या भीतीने घरातील मोटर लपवण्यासाठी त्यांची तारांबळ उडत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नगरसेवकांच्या कार्यालयातील गर्दी देखील वाढली आहे. आमची मोटर जप्त होणार का? आम्हाला दंड होणार का? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी नागरिक नगरसेवकांची कार्यालये गाठत आहेत. तसेच नागरिक मोटर का वापरत आहेत, याकडेही आयुक्त कक्ष देतील का? असाही प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.सुमारे सात वर्षांपूर्वी कोपरखैरणेतील सेक्टर १ ते ८ व १५ ते १८ येथील माथाडी वसाहतीच्या बैठ्या चाळीतील घरासमोर खड्डे खोदून पिण्याचे पाणी भरले जात होते. कमी दाबामुळे नळाला लागलेल्या बारीक धारेतून खड्ड्यात पाणी साठवले जात होते. त्यावेळी प्रशासनाकडून त्याची कसलीच दखल घेतली गेली नव्हती. कालांतराने बैठ्या चाळीच्या ठिकाणी तीन किंवा चार मजल्यांच्या इमारती झाल्यानंतर वरच्या मजल्यावर पाणी पोचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यावर पर्याय म्हणून वापरलेली मोटर सद्यस्थितीत घराघरातील गरज बनलेली आहे.ऐरोली सेक्टर २, ३, ४ व इतर काही भागातही अशीच परिस्थिती आहे. सुमारे तीस वर्षे जुन्या टाकीतून सदर परिसराला पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु मागील काही वर्षांत परिसराचा झालेला भौगोलिक विकास व वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत ही टाकी अपुरी पडत आहे. अशातच सुरू असलेल्या मोटर जप्तीच्या कारवाईमुळे प्रशासनाच्या नावाने खडे फोडत आहेत. महापालिका क्षेत्रात अद्यापही अनेक विभागांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामध्ये सुधार धडवत प्रशासनाने चोवीस तास नको, किमान एक वेळ पुरेसे पाणी द्यावे, अशी भावना रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
तुघलकी भूमिकेमुळे नागरिक हैराण
By admin | Updated: June 25, 2016 02:05 IST