मुंबई : आॅक्टोबर हीटच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत. ३६ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान ३४ अंशावर स्थिरावले आहे. किमान तापमान २६ हून २४ अंशावर घसरले आहे. परिणामी आॅक्टोबर संपत असतानाच कमाल आणि किमान तापमानात होत असलेले बदल मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहेत. हिवाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना अशाच बदलत्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.आॅक्टोबर संपताक्षणी पश्चिमेकडील थंड वारे पूर्वेकडे वाहू लागतात आणि उत्तर भारताला थंडीचे वेध लागतात. सोमवारीच जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीसह पश्चिमेकडून पूर्वेकडून वाहणारे थंड वारे जोर पकडतात. हेच वारे कालांतराने दक्षिण भारताकडे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रसह लगतच्या राज्यांत थंडीचा कडका पडतो. सध्या हीच स्थिती आहे. पारा किंचित घसरला आहे. मुंबईसह परिसरात ढगाळ वातावरण असल्याने येथील उष्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र या बदलामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील ४८ तास मुंबई आणि परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
वातावरणातील हेलकाव्यांचा ‘ताप’
By admin | Updated: October 28, 2015 01:05 IST