मुरलीधर भवार, डोंबिवलीनागरी वस्ती औद्योगिक क्षेत्रात असलेले डोंबिवली हे राज्यातील एकमेव शहर आहे. औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्र यांच्यात ५०० मीटरचे अंतर असायला हवे, असा नियम आहे. मात्र, असा बफर झोन डोंबिवलीत तयार केला गेला नाही. अंबरनाथमध्ये ज्या गतीने नागरी वस्ती वाढत आहे, ते पाहता जर तेथे ‘बफर’च्या मर्यादेचे उल्लंघन झाले तर पुढील दुर्घटना तेथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.डोंबिवलीत औद्योगिक वसाहत विकसित झाली, तेव्हा त्याठिकाणी लोकवस्ती नव्हती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, डोंबिवली ही एकमेव औद्योगिक वसाहत आहे, जेथे उद्योगांबरोबर रहिवासी क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेत्र मुळात कामगारांच्या घरासाठी राखून ठेवण्यात आले होते. परंतु, कामगारांची आर्थिक कुवत नसल्याने हे नागरी वसाहतीचे प्लॉट आर्थिक कुवत असलेल्या अधिकारी, वकील, डॉक्टर यांनी विकत घेतले. त्यामुळे रहिवासी वसाहतीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. कारखान्यांच्या क्षेत्रापासून ५०० मीटरच्या अंतरात रहिवासी बांधकामाला मंजुरी दिली जात नाही. मात्र, डोंबिवलीच्याबाबतीत सरकारने बफर झोन तयार केलाच नाही. एमआयडीसी, कल्याण-डोंबिवली महापालिका व जिल्हाधिकारी यांनीही नागरी वस्ती औद्योगिक क्षेत्रापासून दूर असावी, याचे भान ठेवले नाही. परिणामी, शहराचे आणि औद्योगिक वसाहतीचे नियोजन बिघडले. डोंबिवलीतील कारखान्यांना नागरी वस्तीचा वेढा पडला आहे. त्याचबरोबर सागाव, सोनारपाडा, मानपाडा, दावडी, आजदे ही नागरी वस्ती औद्योगिक कारखान्यांना लागून आहे. राज्य सरकारने २७ गावे महापालिकेतून वगळली, तेव्हा वगळलेला बहुतांश भाग औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित होता. गावात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार एमएमआरडीएकडे होते. मात्र, ग्रामपंचायतीने बांधकामांना परवानग्या दिल्या. बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यामुळे बफर झोनचे उल्लंघन झाले. अंबरनाथमध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत लोकवस्तीपासून लांब होती. तेथे मोठे गृहसंकुलांचे प्रकल्प उभारले जात आहेत. कल्याण, बदलापूर-कात्रपकडून विकसित होणाऱ्या इमारती औद्योगिक क्षेत्राला येऊन भिडणार आहेत. चिखलोलीत रासायनिक कारखाने ते अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दरम्यान बडे गृह प्रकल्प सुरू झाले आहेत. खोणीगाव ते तळोजा मार्गावर मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. डोंबिवलीच्या स्फोटातून धडा न घेता अंबरनाथमध्ये औद्योगिक क्षेत्रात रहिवासी क्षेत्र विकसित करण्यास परवानगी दिली जात असल्याने डोंबिवलीच्या स्फोटाची पुनरावृत्ती येथे होण्याची भीती उद्योजक नंदकुमार भागवत यांनी व्यक्त केली. भागवत यांनी सांगितले की, घरडा सर्कल ते खंबाळपाडा-टाटानाका रोडवर रस्त्यालगत इमारती विकसित केल्या जात होत्या, तेव्हा ‘कामा’ संघटनेने त्याला हरकत घेतली होती. ही हरकत नियोजन प्राधिकरणांनी विचारात न घेतल्याने आज खंबाळपाडा परिसर नव्या गृहसंकुलांनी भरला आहे. डोंबिवली हे अनियंत्रित विकासाचे बळी ठरले आहे. डोंबिवलीचे उद्योग अंबरनाथला स्थलांतरित केल्यावर तेथे वाढत असलेल्या लोकवस्तीकडून पुन्हा काही वर्षांनी उद्योग स्थलांतरित करण्याची मागणी होईल. त्यात उद्योजक भरडले जातील, असे भागवत यांनी स्पष्ट केले आहे.
...तर अंंबरनाथलाही धोका
By admin | Updated: May 31, 2016 03:05 IST