मुंबई : कुलाब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर आणि गणेशमूर्तीनगर या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी करीत गेल्या नऊ दिवसांपासून ते आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत.दक्षिण मुंबईतील ही सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. तिचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत करण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे; तरीही सर्वेक्षणासोबत स्थानिकांचे बायोमेट्रिक केले जात असल्याचा आरोप उपोषणकर्ते शिवाजी जाधव यांनी केला आहे.या वेळी जाधव म्हणाले की, दोन्ही झोपडपट्ट्यांत पात्र झोपडीधारकांची संख्या ७ हजारांहून अधिक आहे. मात्र एसआरएने सर्वेक्षणात २ हजार २०० झोपड्या पात्र ठरवल्या आहेत. शिवाय घरोघरी जाऊन बायोमेट्रिक करण्याऐवजी एका खाजगी विकासकाच्या कार्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी येथील प्रकल्पात लक्ष घालून तत्काळ सर्वेक्षण थांबवावे. तसेच या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.(प्रतिनिधी)
आंबेडकरनगरचे सर्वेक्षण बेकायदेशीर?
By admin | Updated: September 10, 2014 01:50 IST