पालघर / वसई : घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. ते विधानसभेच्या पराभवातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर, पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी मारलेल्या बेडूकउड्या असे चित्र असताना आता या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे इच्छुक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सगळ्यांची अवस्था संभ्रमित झाली आहे. या निवडणुका फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतच होणार असल्याने कोणत्याही पक्षाच्या श्रेष्ठींना त्याचे पुरेसे गांभीर्य नाही. त्यामुळे आघाडी अथवा महायुती करायची काय? असल्यास कोणाशी करायची? तसे ठरले तर वाटाघाटींचे सूत्र काय असावे? वाटाघाटींत कुणाला समाविष्ट करून घ्यावे? या कशाचीही कोणालाही कल्पना नाही. निवडणूक म्हटले की, निरीक्षक नेमणे, अर्ज मागविणे, मुलाखती घेणे, हे नेहमीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी लागणारा वेळही उरलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था तर इतकी बिकट आहे की, नाव घ्यावे असा एकही धडाडीचा नेता उरलेला नाही. त्यामुळे कोणी कुणाकडे बघावे, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. एकच इच्छुक चार-चार पक्षांकडे उमेदवारी मागण्याची चिन्हे असल्याने कुणावर किती विश्वास टाकावा? हा प्रश्न पक्षांना भेडसावतो आहे. जिल्हा विभाजन आणि आरक्षण यामुळे अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच जेरीला आलेले आहेत. त्यामुळे निवडणुकांबाबत निराशाजनक वातावरण आहे. (विशेष प्रतिनिधी)
सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले
By admin | Updated: January 7, 2015 22:22 IST